५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठया प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मिड-डे राऊंड टेबल सेमिनार ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. या सेमिनारमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह मिड डे वृत्तपत्राची संपादकीय टीम उपस्थित होती.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात येत असली तरी कोविड रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असते. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णालयांनी स्वत: ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र गेल्या दीड वर्षापासून कोविड परिस्थितीशी समर्थपणे मुकाबला करीत आहे. या काळात कोविडच्या चाचण्या करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळा उभारणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णालय तयार करणे, आवश्यक ती साधनसामुग्री निर्माण करणे, ऑक्सिजनची उपलब्धता निर्माण करणे यासारख्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या. महाराष्ट्रावरील संकट अजूनही पूर्णपणे संपलेले नसून अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्यात आवश्यक त्या उपाययोजना आणि खबरदारी घेण्यात येत आहे. आपले दैनंदिन जीवन पूर्ववत होण्यासाठी राज्य शासनाच्या या सर्व प्रयत्नात सर्वसामान्यांची साथ असणे तितकेच आवश्यक आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्यात आल्याची माहितीही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.

राज्यात कोविडचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून गेल्या वर्षी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बंद करण्यात आल्या. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदाला आणण्याचा प्रयत्न होत असताना शाळा- महाविद्यालये सुरु करण्यात महाराष्ट्र आघाडी घेईल, असा विश्वासही श्री. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. या सेमिनारमध्ये अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी गेल्या दीड वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत कोविडचा संसर्ग अधिक होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here