राहिवाश्यांना पाचाड गावात स्थलांतरीत करण्यास सुरुवात
रायगड (विशेष प्रतिनिधी) : महाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. आज (दि. २४) रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली आहे. मात्र यात मनुष्यहानी किंवा घरांचे नुकसान झालेले नाही.
राज्यात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या असून महाड तालु्क्यातील तळीयेमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे हिरकणीवाडीतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत हिरकणीवाडीतील रहिवाश्यांना बाजूच्या पाचाड गावात स्थलांतरीत करण्यात येत आहे. डोंगराळ भाग असल्याने, येथे तत्काळ मदत पोहोचविणेही जिकिरीचे आहे. हिरकणीवाडी महाड शहरापासून सुमारे ३० किलोमीटरच्या अंतरावर आहे.
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून आतापर्यंत ४० नागरिकांचे प्राण गेले. येथे दरडीखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भागात बचावकार्य सुरू आहे.






