कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहे. आज शाहुपुरीतील चौकात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. काही मिनिटं दोघांनी संवाद साधला.
मी शाहुपुरीत येत आहे. त्यामुळे तुम्ही शहापुरीतच थांबा. पूरग्रस्त भागाची वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्रच पाहणी करू, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून फडणवीसांना पाठवला होता. त्यामुळे शहापुरीतून निघण्याच्या तयारीत असलेल्या फडणवीसांनी थांबण्याचा निर्णय घेतला. यानंतर शाहुपुरीतील एका चौकात दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यांनी काही वेळ एकमेकांसोबत चर्चा केली.
या भेटीबाबत पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीत कुणीही राजकारण करू नये. मी स्वत: आज शाहूपुरी येथे देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही पुन्हा एकदा सर्वांशी चर्चा करून मदत कशी देता येईल याबाबत निर्णय घेऊ,’ असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.






