मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबईच्या महत्वाच्या चौपाट्यांपैकी एक माहीम रेतीबंदर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री श्री.ठाकरे यांनी माहीम रेतीबंदर परिसराला भेट देऊन या परिसराचा विकास आणि सौंदर्यीकरणाच्या अनुषंगाने पाहणी केली. यावेळी नगरसेवक मिलिंद वैद्य, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.
माहीम रेतीबंदर परिसरात माहीमचा किल्ला आहे तसेच येथून वांद्रे वरळी सागरी सेतूचे विहंगम दृश्य नजरेस पडते. या परिसराचे सुशोभीकरण करून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईकरांसाठी चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असे श्री.ठाकरे म्हणाले.
श्री.ठाकरे यांनी या परिसराचे सुशोभीकरण करताना भिंतीवर माहिमचा किल्ला तसेच सागरी सेतू यांच्याशी मिळतीजुळती चित्रे रेखाटावीत, रेतीचा भाग स्वच्छ करून घ्यावा, विविध शिल्पकृती तयार करून त्यामध्ये सुसंगत अशी वृक्षलागवड करावी, माहीमचे नाव आणि सागरी सेतु यांच्याशी सुसंगत पर्यटकांना आकर्षित करणारी एलईडी लाईटची कलाकृती तयार करावी, ओपन जिम उभारावी अशा विविध सूचना केल्या. यावेळी श्री. दिघावकर यांनी सुशोभीकरणाबाबतचे नियोजन सादर केले.






