पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : राज्यभरातील होमगार्ड आक्रमक झाले असून विविध मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठानच्यावतीने पुणे ते मुंबई पायी मोर्चा आज पुण्यातून काढण्यात येणार होता. या पायी मोर्च्यासाठी राज्यभरातील मोठ्या संख्येने होमगार्ड एकत्र देखील आले होते. मात्र पायी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर राज्यातील होमगार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
वारंवार गृहमंत्री, गृहराज्यमंत्री तसेच स्थानिक प्रशासन यांना निवेदन देऊनही मागण्या मान्य होत नाही. अनेक होमगार्डवर अन्याय करून त्यांना सेवेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. जाचक अटी लावून होमगार्डना काढून टाकण्यात येत आहे. आज जरी पोलिसांनी पायी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आम्ही पायी मोर्चा काढण्यावर ठाम आहे. जिल्हाधिकारी यांच्याशी पायी मोर्च्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराने यांनी दिला आहे.
जाचक अटी लावून विविध कारणांनी अपात्र होमगार्ड यांना त्वरित विनाअट कामावर रुजू करून घ्यावे. होमगार्डना कायमस्वरूपी ३६५ दिवस कामावर घ्यावे. बंदोबस्त मानधन आठवड्याभरात द्यावे. पोलीस खात्यातील ५ टक्के आरक्षण १५ टक्के करण्यात यावे. तीन वर्षांनी होणारी पुनरनोंदणी/पुनर्नियुक्ती पद्धत बंद करावे. जिल्हा समादेशक पद पूर्ववत ठेवावे. आंदोलकांवरील झालेली कार्यवाही त्वरित थांबवण्यात यावी. वय वर्ष ५० वरील होमगार्ड यांचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. अशा विविध मागण्या यावेळी होमगार्ड यांच्याकडून करण्यात आल्या आहे.






