कर्जत येथील पंचवीस वर्षीय तरुणाचा धरणात बुडून मृत्यू
कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : गटारीची मजा करण्यासाठी कर्जत येथून आलेल्या पाच तरूणां पैकी धीरज भगवान बडेकर ( वय 25 राहणार किरवली कर्जत ) याचा रविवारी पोखरण सोंडेवाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोखरण सोंडे वाडी या ठिकाणी पंधरा दिवसातील तिसरा बळी गेला आहे तर तालुक्यात दोन महिन्यात वर्षा पर्यटनाचे पाच बळी झाले आहेत. रविवारी वर्षा पर्यटन आणि गटारीची मजा लुटण्यासाठी कर्जत येथील किरवली गावात राहणारा धीरज चार मित्रांसमवेत खालापूर हद्दीतील पोखरण सोंडेवाडी येथे आला होता. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास पाण्याचा अंदाज आल्याने धीरज बुडाला. त्याच्या समवेत असलेला मित्राने स्थानिकांच्या मदतीने धीरज चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर अडीच तासांनी धीरजचा मृतदेह सापडला.
घटनेची माहिती मिळताच चौक पोलीस दूरक्षेत्र चे कर्मचारी घटनास्थळी पोचले होते. धीरज याला कर्जत येथील रुग्णालयात नेण्यात आले होते. 25 जुलैला चेंबूर येथील राहुल जाधव आणि 30 जुलैला मानखुर्द येथील नितेश कसबे या तरुणांचा पोखरण सोंडे वाडी जवळील धरणात बुडून मृत्यू झाला. घटनेला 24 तास उलटत नाही तोच चेतन बाविस्कर याचा नढाळ धरणात बुडून झालेला मृत्यू झाला होता. राहुल जाधव आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नितेश कसबे यांचा ज्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला त्याच ठिकाणी पोस्टात कामाला असलेल्या धीरज याचा रविवारी मृत्यू झाला.






