दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांना मिळणार लोकल प्रवासाचे प्रमाणपत्र
पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) – सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर मा.मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधताना १५ आँगस्टला सर्व सामान्यसाठी लोकल प्रवास सुरु करण्याचे साांगीतले.
याबाबत कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मा. मुख्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत त्यांना लोकल प्रवासासाठी महापालिकेच्यावतीने आजपासून प्रमाणपत्र पडताळणी करून प्रमाणित करून देण्यात येणार आहे. यानंतर या नागरिकांना लोकल प्रवासासाठी महिन्याचा पास मिळणार आहे. याचे प्रशिक्षण काल आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात देण्यात आले. यावेळी आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
ज्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊन चौदा दिवस पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांनी लोकल प्रवासासाठी प्रमाणपत्र घेण्यास येताना आपले अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स , लसीकरण केलेले प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन यायचे आहे. पनवेल स्टेशन, खांदेश्वर स्टेशन, मानसरोवर स्टेशन , खारघर स्टेशन याठिकाणच्या तिकीट घराबाहेर प्रमाणपत्र पडताळणी केंद्र पालिकेच्यावतीने उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. अशा नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करुन या नागरिकांना प्रवासासाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सकाळी ७ ते दुपारी 2 आणि दुपारी ३ ते रात्री १० अशा दोन शिफ्ट मध्ये हे काम सुरु असणार आहे.
यावेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, बाबासाहेब चिमणे रेल्वेचे अधिकारी सुधीर कुमार, व्ही. एल. गोयल उपस्थित होते.






