महापौर सौ.जयश्री महाजन : ‘इंडिया इन टॉलरन्स’चे जळगावात प्रकाशन
जळगाव (महाराष्ट्र क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : निसर्ग मानवाला पदोपदी सहिष्णुतेबाबत जाणीव करून देत असतो. मात्र, मानव त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच करत असतो. म्हणूनच जाती, धर्मांत तेढ निर्माण करण्यांचे फावते. त्यामुळे असे न करता मानवाने सहिष्णुता जपणे नितांत गरजेचे आहे, असे मत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी शनिवार, दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी अकराच्या सुमारास जळगावातील गणपतीनगरातील रोटरी हॉलमध्ये आयोजित तारिक शेख लिखित ‘इंडिया इन टॉलरन्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्त केले.
माजी उपमहापौर मा.श्री.अब्दुल करीम सालार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मा.डॉ. विकास बोरोले, आकाशवाणीच्या सेवानिवृत्त निवेदिका डॉ.उषा शर्मा, अब्दुल रऊफ शेख, लेखक तारिक शेख, मा.श्री.सचिन नारळे, डॉ.गोविंद मंत्री, मा.श्री.सतीश मोरे, मुख्याध्यापक हारून बशीर, ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.दिलीप तिवारी, मा.श्री.गनी मेमन यांच्यासह रोटरीयन याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘कोरोना’च्या पहिल्या लाटेवेळी विशिष्ट समुदाय लक्ष्य करून त्याचे वेगळे चित्र निर्माण केले जात असल्याचे माध्यमांत दाखविले गेले. किंबहुना काही लोकांकडून तसे भासवलेही गेले. मात्र, त्यापलीकडील सहिष्णू भारताचे दर्शन घडले. या वास्तविकतेला आणखी धार देत ‘इंडिया इन टॉलरन्स’ या पुस्तकात सहिष्णुतेच्या बाजूने जाणार्या प्रवासाचा वेध लेखकाने घेतल्याचे मत विविध मान्यवरांनी मांडले. सदर पुस्तकाची रचना दोन भागांत केलेली आहे. त्यात 143 कथांचा समावेश असून, माध्यमांचा टीआरपी वाढविण्यासाठी गैरवापर, तिरस्कारार्थींची मानसिकता, मानसशास्त्रीय संशोधन, सामाजिक आरोग्यावर झालेला त्याचा परिणाम आदी आठ प्रकरणे आहेत. लेखक तारिक शेख यांनी प्रास्ताविकात पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली. अल्ताफअली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.






