शहरी आरोग्य यंत्रणेचे प्रारूप तयार करणे गरजेचे:डॉ प्रदीप आवटे

‘शहरी भागातील आरोग्य समस्या आणि एरिया सभेचे महत्व ‘ वेबिनारला प्रतिसाद

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) :क्षेत्रसभा समर्थन मंच,इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप,जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या संस्थांच्या वतीने ‘शहरी भागातील आरोग्य समस्या,त्यावर उपाय योजना आणि एरिया सभेचे महत्व’ या विषयावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

या वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला.डॉ.प्रदीप आवटे (राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी),डॉ.कल्पना बळीवंत (सहाय्यक आरोग्य प्रमुख,पुणे मनपा) यांनी मार्गदर्शन केले.२३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता हा वेबिनार झाला. देशातील नागरिकांचे आरोग्य,यामधिल ७४ वी घटना दुरुस्ती मधिल नागरीकांना मिळालेले हक्क आणि अधिकार यावरही चर्चा झाली.

डॉ प्रदीप आवटे म्हणाले,’क्षेत्रीय सभांचा उपक्रम कौतुकास्पद आहे,त्याचे स्वागत केले पाहिजे. देशात त्री-स्तरीय विकेंद्रित प्रशासन यंत्रणा आहे.आरोग्य विषयक सरकारी उपक्रमात लोकसहभाग आवश्यक आहे.या उपक्रमांची माहिती नागरिकांनी करून घेतली पाहिजे. नागरिकांनी,कार्यकर्त्यांनी आपल्या अपेक्षांची ब्लू प्रिंट करून शासनाला सादर केली पाहिजे. आपल्या गल्लीचे,परिसराचे नियोजन स्थानिक पातळीवर झाले पाहिजे.घरापलीकडे पाहण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे.लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा वाढण्याचा आग्रह धरला पाहिजे.त्यासाठी राजकीय कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी यंत्रणांनी एकत्र काम केले पाहिजे.शहरी आरोग्य यंत्रणेचे प्रारूप तयार करणे गरजेचे आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करून प्रदूषण कमी केले पाहिजे.शहर आरोग्यदायी होण्यासाठी त्याचा उपयोग होईल’.

डॉ.कल्पना बळिवंत म्हणाल्या,’आरोग्य यंत्रणेच्या कामामुळे मलेरियावर नियंत्रण मिळाले पण डेंग्यू,चिकनगुनिया प्रादुर्भाव होतो आहे.नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.पालिका काम करत असते.तरीही घराघरातून जनजागृती झाली पाहिजे.आरोग्य कर्मचाऱ्यांना घरात,सोसायटीत येऊ दिले पाहिजे.स्वतःचे घर,स्वतःचा परिसर याची काळजी घेतली तरी आरोग्य यंत्रणेला मदत होते.क्षयरोगासारखे रोग लपवले जाऊ नयेत.शहरी आरोग्यामध्ये नागरिकांचीही मदत मिळाली पाहिजे.मनपाच्या दवाखान्यामध्ये चांगल्या सेवा दिल्या जातात.शहरी गरीब योजनेतून मदत दिली जाते.त्याचे हेल्थ कार्ड घेतले पाहिजे.बोगस डॉक्टर शोधण्याची मोहीम राबवली जाते,कारवाई केली जाते,त्याचाही शहरी आरोग्य जपण्यात उपयोग होतो. अल्लाउद्दीन शेख यांनी सूत्रसंचालन केले.असलम इसाक बागवान यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here