ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये आलेल्या महापुरामुळे संपूर्ण शहराचे अतोनात नुकसान झाले होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक चवदार तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ आणि चिखल साचलेला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चवदार तळ्याची स्वच्छता करण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि महाड नगरपरिषदेच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवून हाती घेण्यात आली. यावेळी सक्शन पंप, फायर ब्रिगेडचे टँकर यांच्या सहाय्याने सफाई कर्मचाऱ्यांनी चवदार तळ्यातील गाळ काढून ते स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. पुढील काही दिवस हे काम सुरूच राहणार असून या ऐतिहासिक स्थळाचे सौंदर्यीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.


यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.






