ठाणे (जिल्हा क्राइम प्रतिनिधी प्रकाश कदम) : आज (दि.२६) एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. ७०१ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाचे ७४ टक्के काम एव्हाना पूर्ण झालेले आहे. १० जिल्ह्यांना प्रत्यक्ष तर १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे हा महामार्ग जोडला जाणार असून, विदर्भ आणि मराठवाडा या भागांसाठी हा महामार्ग विकासाचा स्त्रोत ठरणार आहे.
या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या आठ तासात पार करणे शक्य होणार आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा कार्यान्वित करण्यात येणार असून डिसेंबर २०२२ पर्यंत हा महामार्ग लोकसेवेस सुरू होईल. संपूर्णपणे ग्रीनफिल्ड कॉरिडॉर असून या संपूर्ण महामार्गावर दुतर्फा ११ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तर रस्त्याचे काम करताना १९१ ठिकाणी भरणी काम करण्यासाठी पडलेल्या खड्डयात शेततळी तयार करण्यात आलेली आहेत. याशिवाय ३ अभयारण्यांतून हा महामार्ग जाणार असल्याने वन्यजीवांना कोणतीही हानी होऊ नये यासाठी जागोजागी अंडरपास आणि टनेल बनवण्यात आले आहेत.

या महामार्गावर २० जिल्हा कृषी केंद्र उभारण्यात येणार असून त्याद्वारे ग्राहक आणि शेतकरी यांच्यातली दरी कमी होण्यास मदत होणार आहे. नागपूरचा मिहान आणि मुंबईतील जेएनपीटी हे बंदर एकमेकांना जोडले जाणार आहेत. आज या महामार्गाच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना या कामाची माहिती दिली. यावेळी एमएसआरडीसी चे सह महाव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पावर काम करणारी त्यांची टीम देखील उपस्थित होती.






