मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पुन्हा घोटाळ्याचे आरोप केले. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत ११ जणांची नावे आहेत.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी अनधिकृत बांधकाम केले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले आहेत. माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएच्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू आहे, छगन भुजबळांवर आरोप आहेत. शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी दुबईत पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला आणि पाडला.
कोकणातील मुरुड येथे रिसॉर्ट बांधण्यासाठी अनिल परब आणि त्यांचे सहकारी सदानंद कदम यांनी ५ कोटी ४२ लाख २४ हजार २०० रुपयांचा खर्च केला, असे प्रमाणपत्र सीए केतन जतानिया यांनी दिले आहे. इतके पैसे परब यांनी कोठून आणले, असे सोमय्या म्हणाले.






