मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने राज्यातील प्रतिबंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. मात्र ते न जुमानता मंगळवारी गोपाळकाल्यानिमित्त दहीहंडी फोडणारच, असा पवित्रा भाजप आणि मनसेने घेतला आहे.
घाटकोपर येथे भाजप आमदार राम कदम यांनी यंदा पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणारच असा पवित्रा घेतला आहे. मनसेने सरकारी आदेश झुगारून ठाण्यात दहीहंडी साजरी करण्याची तयारी चालवली होती. पोलिसांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे.
आम्ही आता दादरमध्ये दहीहंडी फाेडू, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे, कोरोना प्रतिबंधक नियम १८८ प्रमाणे कलम १४९ च्या अनुसार दहीहंडीची तयारी करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत.






