जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : गेल्या महिनाभरपूर्वी पावसाने दडी मारल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मात्र सलग दोन ते तीन दिवस पावसाने सलग हजेरी लावल्याने काही प्रमाणात का होईना पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र खरीप हंगामातील पिके जळाल्याने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून गेला होता.
दरम्यान तेव्हापासून पुन्हा पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी हवामान खात्याकडून विदर्भ, खान्देश, मराठवाडयासह संपुर्ण राज्याला वादळी वार्यासह मुळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळपासून जळगाव जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली.
संपुर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने कधीकाळी कोरड्या पडलेली नदी, नाले देखील दुथडी भरुन वाहू लागले आहेत. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु आज सकाळपासून पावसाची रिपरीप सुरु होती. परंतु दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
सुमारे दीड ते दोन तास सुरु असलेल्या मुसळधारसामुळे शहरातील नवीपेठ, समता नगर, प्रजापत नगर, मेहरुण परिसर, बजरंग बोगदा, गोपाळपुरा, जूने जळगाव, हरिविठ्ठल नगर, खंडेराव नगर या भागात पावसाचे पाणी घरांमध्ये शिरले होते. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याने त्यांच्या घरातील साहित्य खराब झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.






