चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस; वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आजसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, कोकणातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीत कालपासून कोसळणाऱ्या पावसानं हाहाकार माजवला आहे. खेड, दापोलीत पावसानं विश्रांती घेतली असली तरी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस आहे. कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं शहरातील वशिष्ठी नदी पात्राची पाणी पातळी वाढली आहे. मात्र, परिस्थिती अद्याप नियंत्रणात आहे. मात्र, सोमवारपासून पावसाची संततधार असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. २२ जुलै रोजी आलेल्या महापूराने गटारात आलेली माती व काही ठिकाणी चोकअप झालेल्या ड्रेनेजमुळे हे पाणी लवकर रस्त्यावर येण्याचा धोका आहे.

दरम्यान, दापोली शहर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने केळस्कर नाका परिसरातील जुन्या बैठया चाळ सदृश्य कृषी विद्यापीठ वसाहतीत घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरबुडी परिसरात जालगाव हद्दीत असलेल्या घरात पाणी शिरले होते. रात्रीनंतर पाऊस थांबला असून दापोली शहरात आता पूर्णतः पाणी ओसरल आहे.खेड मध्येही परिस्थिती नियंत्रणामध्ये असून जगबुडी नदिने पात्र सोडलेले नाही, मात्र सतर्कतेचा इशारा खेड नगर परिषद प्रशासनाकडून रात्रीच देण्यात आला आहे.

चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनामधील तीन बोटी शहरात तैनात केल्या आहेत. येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसंच, शहरांमध्ये पुन्हा पाणी भरण्याच्या भीतीने चिपळूणच्या व्यापाऱ्यांनी काल रात्रीपासूनच दुकानातील सामान उंचीवर ठेवायला सुरूवात केली आहे. शहरातील शिव नदीपात्रामध्ये साडेचार मीटर इतकी उंची नोंदवण्यात आले. रात्री उशिरा ही नदी ओव्हरफ्लो झाली होती मात्र आत्ता ओहोटी असल्याने पाण्याची पातळी कमी आहे. सध्या शहरातील मार्कंडी येथील सखल भागात, टिळक वाचनालय रस्ता येथील रस्त्यावर पाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळतय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here