खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने सुरु केले उत्तर महाराष्ट्रातील पहिले रात्रकालीन महाविद्यालय

जळगाव (महाराष्ट्र सहसंपादक तिलोत्तमदास बोंडे) : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व संचालक मंडळ सतत खान्देशातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन सामाजोभिमुख आणि विद्यार्थी केंद्रित रोजगारभिमुख आणि कौशल्यधीष्ठीत अभ्यासक्रम राबवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आज खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आपल्या खान्देश परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. तो म्हणजे रात्रकालीन कान्ह कला व वाणिज्य महाविद्यालय होय. उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच रात्रकालीन महाविद्यालय सुरु झाले असल्याची माहिती प्राचार्य स.ना. भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,जे विद्यार्थी काम करतात, छोटा-मोठा व्यवसाय, नोकरी करतात.. त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी दिवसा श्रम करून रात्रकालीन महाविद्यालयात नियमित वर्ग शिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याकरिता हे महाविद्यालय असेल. साधारणतः सायंकाळी नियमित वर्ग भरले जाऊन शिक्षणाबाबत तज्ञांचे मार्गदर्शन मिळणे सुलभ होईल आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थी आपल्या क्षमता वाढवून स्वतःचा विकास करू शकेल. याकरिता के.सी.ई. सोसायटी जळगाव ने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तो या 2021- 22 या शैक्षणिक वर्षापासून जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असतील ते या रात्र कालीन महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील.

कला शाखेत संगीत,नाट्य,इंग्रजी,मराठी,राज्यशास्त्र,भूगोल,समाजशास्त्र हे विषय आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊ शकतात. सदर महाविद्यालय हे मू.जे महाविद्यालयाच्या परिसरात असेल. याकरिता तज्ञ व अनुभवी अशा प्राध्यापकांचे मार्गदर्शन, सुसज्ज ग्रंथालय, भव्य क्रीडांगण व क्रीडा स्पर्धा व स्पर्धात्मक परीक्षा(M.P.S.C./U.P.S.C./बँक,विमा,रेल्वे,स्टाफ सिलेक्शन बोर्ड,सैनिक भरती इ.) क्षेत्रात सहभागी होण्याची सुसंधी असेल. सदर महाविद्यालय हे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश त्वरित निश्चित करावा.असे प्राचार्य नंदकुमार भारंबे यांनी केले आहे.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1944मध्ये करण्यात आली. सर्वांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने ज्ञान प्रसारो व्रतम या ब्रीद वाक्याने शिक्षण प्रसारण करण्यास वचनबद्ध असलेली एक संस्था म्हणून जळगाव महाराष्ट्र येथे या संस्थेची स्थापना झाली. उत्तर महाराष्ट्रात मुंबईच्या ईशान्यपासून 400 किलोमीटर अंतरावर स्थित असलेली एक आघाडीची शिक्षण संस्था म्हणजे के सी ई सोसायटी होय. ज्ञानाच्या प्रगती आणि प्रसारासाठी ही संस्था कार्यरत आहे. विविध सामाजिक स्तरातून उत्तम कारकीर्द घडवण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण ,विविध भाषा ,उदारमतवादी कला, मानसिक ,नैतिक आणि मानवी तसेच नैसर्गिक विज्ञान ,शिक्षण शास्त्र, व्यवसाय प्रशासन आणि व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान अशा विस्तृत शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून दिले जाते. केसीई सोसायटी एक एकर क्षेत्रावर विस्तारलेली आहे. ज्यात सत्तावीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील पंच्याहत्तर वर्षांपासून अविरत शैक्षणिक कार्य सुरू असून ही संस्था आता शैक्षणिक क्षेत्रात प्रगल्भता प्राप्त झालेली आणि संशोधनाचे माहेरघर असणारी संस्था आहे.

नुकतेच मुळजी जेठा महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा प्राप्त केला आहे. आधी कळसनंतर पाया याची उक्ती संस्थेच्या पी.जी.टू के.जी.हि शैक्षणिक प्रगती बघताना दिसून येते.१९४५ मुळजी जेठा महाविद्यालय,१९६५ शिक्षणशास्त्र व शरीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय,१९७० एस.एस.मणियार लॉ कॉलेज,१९८६ आय.एम.आर.कॉलेज,१९८६ किलबिल बालक मंदिर,१९८६ ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय,१९९७ ओरीऑन इंग्लिश मिडीयम स्कूल (स्टेट बोर्ड),२००४ एकलव्य क्रीडा संकुल,२००५ अध्यापक विद्यालय,२००६ जलश्री वाटरशेड सर्व्हेलन्स अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट,२००७ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि इन्फोर्मेशन टेकनोलॉजि,२००७ ओजस्विनी कला महाविद्यालय,२००९ स्पार्क डिझाईन अॅण्ड प्रिंट सर्विसेस ,२००९ स्पार्क इन्स्टिट्यूट ऑफ मल्टीमिडिया अॅण्ड प्रिंटिंग टेक्नॉलॉजी,२०१० ओरी ऑन सी.बी.एस.ई.इंग्लिश मिडीयम स्कूल,२०१० पोस्ट ग्रज्युएट कॉलेज ऑफ सायंस टेकनोलॉजि अॅण्ड रिसर्च,ज्ञानज्योत इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्सलन्स,२०१८ डॉ.अब्दुल कलाम स्कील डेव्हलपमेंट सेंटर हा विस्तार वाढता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here