पाचोरा (तालुका प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी साठल्याने तसेच जोरदार वादळाने अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
पाचोरा व परिसरात झालेल्या मुसळधार पावसात खान्देशातील सुप्रसिद्ध लोकशाहीर नगरदेवळा येथील रहिवासी शाहीर शिवाजीराव पाटील यांचे मातीचे घर कोसळले आहे.
शिवाजीराव पाटील हे गेली पन्नास वर्ष केवळ दोनशे स्क्वेअर फूटच्या मातीच्या घरांमध्ये आपली गुजराण करतात, शाहीर शिवाजीराव पाटील यांचे नाव गेले अनेक वर्षे दारिद्र्यरेषाखालील यादीत असताना देखील त्यांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ अद्यापही मिळालेला नाही. अतिवृष्टीत त्यांचे घर पडल्यामुळे ते बेघर झाले असून, भरपावसात राहण्याची समस्या त्यांच्यासमोर उभी राहिलेली आहे.
शाहीर शिवाजीराव पाटील यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून गेली पन्नास वर्षे आपल्या शाहिरी समाजाचे प्रबोधन करीत आहेत. त्यांना घरासाठी तात्काळ मदतीची गरज करत असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह कलाप्रेमींनी त्यांना घरासाठी सहकार्य केल्यास शिवाजीराव पाटील यांच्यावरचे हे अस्मानी संकट दूर होऊ शकते.






