मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने आज याबाबत निर्णय दिला.
दरम्यान या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. एसीबीकडे या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचे न्यायालयाने आज निर्णय देताना म्हटले आहे. छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबियांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. छगन भुजबळ यांनी दिल्ली उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. दरम्यान या निर्णयानंतर छगन भुजबळ, पुतण्या समीर आणि मुलगा पंकज भुजबळ यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भुजबळ यांच्यासह अन्य चौदाजणांविरोधात दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात एकएक करत सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यात विकासक चमणकर कुटुंबियातील प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, कृष्णा चमणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरूण देवधर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे.






