ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एकाच गाडीत तीन जण अडकून पडले होते. तर या अपघातात पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. कार चालक विनोद खरात (३०) यांच्यासह सृष्टी पाटील (१८) आणि पांडुरंग पाटील (४५) हे कारमध्ये अडकले होते. नंतर या तिघांनांही सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांना मीरा भाईंदर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघातात रस्त्यावर ऑइल सांडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.
रविवारी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास, मे पारस पेट्रो प्रा.ली.च्या मालकीचा ऑईलने भरलेला टँकर, चालक घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी गायमुख घाटात चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यामुळे हा ट्रक तीन चारचाकी वाहनांसह घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहिनीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये एका कारमध्ये तिघे जण अडकून पडले होते. या अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह वाहतूक पोलीस, ठाणे व मीरा भाईंदर या दोन्ही महापालिकांचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच या अपघातात कोणी जखमी झाले आहे का? याची पाहणी केली त्यावेळी एका गाडी तिघे अडकल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि त्यांची काही तासात यशस्वीपणे सुटका केली. त्या तिघांना गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी मीरा भाईंदर येथील भक्ती वेदांत हॉस्पिटल दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन कार, एका ट्रक आणि टँकरचे नुकसान झाले आहे.
यावेळी ठाणे अग्निशमन दलाचे दोन इमर्जंसी टेंडर, एक फायर वाहन, एक क्यूआरव्ही, मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन, एक क्रेन, तीन हायड्रा, एक जेसीबी, तीन रुग्णवाहिकांना पाचारण केले होते. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.






