मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधातील ईडीची चौकशी तब्बल ७ तास सुरु होती. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात अनिल परब यांनी चौकशीसाठी हजेरी लावली होती. अनिल परब यांना मंगळवारी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते.
या समन्सच्या अनुषंगाने परब कार्यालयात हजर झाले होते. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर अनिल परब यांना सोडण्यात आले आहेत. चौकशी संपल्यानंतर अनिल परब यांनी पुढील कारवाईसाठी संपुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याची माहिती दिली आहे. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा नोटीस पाठवली होती.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ईडीने सचिन वाझे यांचा जबाब नोंदवला होता. या जबाबात वाझेने सांगितले की, पोलीस दल आणि परिवहन विभागाच्या बदल्यांमध्ये २० कोटी रुपये अनिल परब यांनी घेतले. यानंतर अनिल परब यांनी ईडीची नोटीस आली. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाचे अधिकारी आणि परब यांचे जवळचे बजरंग खरमाटे यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता परब पुन्हा दुसरं समन्स बजावण्यात आले होते.
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीसाठी हजेरी लावली होती. अनिल परब यांची तब्बल ७ तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर कार्यालयातून बाहेर आल्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, आज मला ईडीकडून जे समन्स आले होते त्यानुसार ईडी कार्यालयात आलो, अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ईडी ही एक यंत्रणा असून तिला उत्तरे देण्याची माझी जबाबदारी आहे. वैयक्तिक व्यक्तिला उत्तरे देणं जबाबदारी नाही. म्हणून यंत्रणेने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.






