नरडाणा गटातील उमेदवार स्वाती दिनेश बच्छाव यांच्या प्रचारार्थ डाबली येथे कॉर्नर सभा संपन्न
शिंदखेडा (प्रतिनिधी) : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून देशात प्रचंड महागाई वाढली असून अच्छे दिनचे काय झाले ? असा घणाघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक २०२१ च्या पार्श्वभुमीवर शिवसेना महाविकास आघाडीतर्फे नरडाणा जिल्हा परिषद गटातील उमेदवार स्वाती दिनेश बच्छाव यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा डाबली ता.शिंदखेडा गावांत काल दि. ०१ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाली.
शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, युवासेना तालुकाप्रमुख प्रदीप पवार, सोनवणे सर, दिनेश बच्छाव, उपसरपंच प्रवीण पाटील, शांतीलाल जिभाऊ, किशोर पाटील, संभाजी पाटील, ताराचंद पाटील, आनंदा पाटील, रमेश पाटील, गोपीचंद बापु, आनंदा आबा, राहुल पाटील, लोटन देवरे, आसाराम भाऊसाहेब, माजी सरपंच राजेंद्र पाटील, जी.बी.पाटील, रज्जु दादासह डाबली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना श्री.साळुंके म्हणाले की, कोविड-19 च्या काळात जनतेची घेतलेल्या काळजीमुळे महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा विश्वास वाढत आहे. यामुळेच महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी केंद्र सरकार राज्याची अडवणूक करत आहे. देशात सुडबुध्दीने राजकारण सुरु आहे. जो विरोध करतो त्याची ईडी, सीबीआय मार्फत चौकशी केली जाते. निवडणुका लागल्या की, जनतेची दिशाभुल केली जाते. यासाठी जनतेने कुठल्याही भुलथापांना बळी पडू नये. तसेच शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार स्वाती दिनेश बच्छाव यांना निवडून आणण्याचे आवाहन केले






