मुंबई (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नोंदणीकृत कामगारांसाठी योजना उपक्रम व कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करत असते. मंडळाने अनेक ललित कलांना प्रोत्साहन देत कलाकारानं करता मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि याच व्यासपीठावरून अनेक साहित्यिक लेखक कथाकार कवी अभिनेते तंत्रज्ञ निर्माण झाले आहेत व आपापल्या क्षेत्रात आपले अढळ स्थान त्यांनी निश्चित केलेले आहे. करोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये या सर्व कार्यक्रमांना खिळ बसली होती म्हणून त्यास पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यभर ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचे मंडळाच्या सात विभागातून आयोजन केले आहे.
विभाग स्तरीय स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाने विजय झालेल्या स्पर्धकाला राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत सहभाग मिळणार असून ही स्पर्धा दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी हुतात्मा बाबू गेनू गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे संपन्न होणार आहे. विभागीय कार्यालय ठाणेच्या वतीने दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली *ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर-२, विक्रोळी येथे नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेत ठाणे विभाग अंतर्गत येणाऱ्या मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या एकूण २९ कामगार कवींनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेत कामगार जीवनावर आधारित वेगवेगळ्या विषयांवर कविता या स्पर्धेमध्ये सादर झाल्या असून या ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
कामगार कल्याण केंद्र टागोर नगर मधील गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल विक्रोळी येथील शिव हरेश भोलानाथ परब हे प्रथम क्रमांकाने विजयी झाले आहेत, तर द्वितीय क्रमांक : उमेश जाधव (विभा हॉस्पिटॅलिटी) कामगार कल्याण केंद्र टिळक नगर यांनी तृतीय क्रमांक : महेश शिवाजी जरांडे (सीमेन्स लिमिटेड कळवा) कामगार कल्याण केंद्र उल्हासनगर यांनी तर उत्तेजनार्थ क्रमांक : आदिनाथ सावर्डेकर (सुपर्मॅक्स पर्सनल केअर लि. ठाणे) कामगार कल्याण उल्हासनगर यांनी पटकावला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिमेंन्स लिमिटेड कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. महेश सावंत पटेल यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली. संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ कवी मा. श्री शशिकांत आढाव व मा.श्री राकेश शिर्के यांनी केले.
संपूर्ण स्पर्धेच्या आयोजना करिता ठाणे विभागाचे प्रभारी कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सहभागी पाहुण्यांचे ऑनलाइन शब्द सुमनांनी व उपस्थित परीक्षकांचे पुस्तक देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली नाईक यांनी केले तर गजेंद्र आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय राणे, प्रवीण सकट, विनोद पाटील, संजय गुरव, दिनकर चौधरी, स्वप्ना सावंत, श्रद्धा राणे, संजना कोळकर, साक्षी शिवलकर यांचे मोलाचे योगदान लाभले.






