ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : भिवंडी येथे फर्निचर गोडाऊनसह कारखान्याला आग लागल्याने लाखो रूपयांचे फर्निचर खाक झाले आहे. भिवंडी, ठाणे, कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत आजूबाजूची दुकानंही जळून खाक झाली आहेत.
भिवंडीत काल उशिरा फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागली. भिवंडी – ठाणे मार्गावर भिवंडी तालुक्यातील कशेळी टोलनाक्यानजीकच महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे. भिवंडी, कल्याण डोंबिवली, ठाणे इथल्या अग्निशमन दलांनी आग विझवण्यासाठी शर्थ केली. मात्र आग एवढी भीषण आहे की अग्निशमनाला आणखी काही तास लागतील अशी शक्यता आहे. आगीमुळे शेजारची इतर दुकानंही जळून खाक झाली.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. आतापर्यत या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचेही सांगण्यात आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शेजारची दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली आहे.






