सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : येथे पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या पतीने चक्क आपल्या घरालाच आग लावली. त्याने स्वतःचे घर पेटवल्यानंतर त्यांच्या शेजारील १० घरांनीही पेट घेतला आणि यामुळे शेजारील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असेलल्या माजलगाव येथे ही घटना घडली आहे. संजय पाटील या व्यक्तीचं आपल्या पत्नीसोबत भांडण झालं. या भांडणानंतर संतापलेल्या संजय पाटील याने चक्क आपलं घर पेटवलं. घराला आग लागल्याने घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर संजय पाटील यांच्या घराशेजारी असलेल्या १० घरांनीही पेट घेतला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी संजय पाटील याला पकडून चांगलाच चोप दिला.
या आगीत सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पती आणि पत्नी यांच्यात वाद नेमका कोणत्या कारणांवरुन झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र त्या दोघांच्या भांडणात दहा घरांची राखरांगोळी झाली आहे.






