अलिबाग (विशेष प्रतिनिधी) – रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या शौर्य पदक फलकावर रायगड जिल्हा पोलिस दलातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बदली झालेले धर्मराज दत्तात्रेय भोईर आणि सुनिल चंद्रकांत गोंधळी या पोलिस पदक मानकऱ्यांचे नाव लावावे असे पत्र रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांना रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी दिले आहे.
पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामाबाबत राष्ट्रपती अथवा पोलिस महासंचालक यांच्याकडून पदक देण्यात येते. हे पदक प्राप्त झालेले पोलिस अधिकारी व कर्मचारी जिल्हा पोलिस मुख्यालयात व शहर आयुक्त कार्यालयात नागरीक येतात त्यांना त्यांचे कर्तृत्व माहित व्हावे यासाठी जयपाल पाटील यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे फलक लावावेत अशी मागणी केली होती. त्यानुसार ती मंजूर होवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कार्यालयाच्या प्रथमदर्शनी लावण्यात आली आहे. आपल्या रायगड जिल्ह्यातील वरील दोन्ही पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये बदली होवून गेले होते आणि त्यांना पोलिस पदकही प्राप्त झाले आहे. त्या दोघांची नावे जिल्हा मुख्यालयात लावलेल्या पोलिस पदक बोर्डावर लावण्याचे राहून गेले असल्याने या दोघांची नावे या बोर्डावर लावण्यात यावी अशी मागणी रायगड भूषण जयपाल पाटील यांनी केली असून ते महाराष्ट्र निवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सल्लागार म्हणून काम पहातात. या पत्राच्या प्रती पोलिस महासंचालक, कोकण परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे माहितीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.








