शब्द आणि संस्करांमध्ये राष्ट्राला एक संघ करण्याची क्षमता – प. पू. महामंडलेश्वर जनार्दन महाराज

जागर निबंधस्पर्धा शब्दरूपी श्रीमंतीची वैचारिक चळवळ मान्यवरांचा सूर

भुसावळ (तालुका प्रतिनिधी गिरीश पवार) : येथील जागर प्रतिष्ठानचा 6 वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. वर्धापन दिनानिमित्त शिक्षक शिक्षकेतर व खुल्या गटात आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक श्रीराम पाटील, प पू महामंडलेश्वर जनार्दन महाराज, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन गोपाल दर्जी, जिल्हा परिषद सदस्य पल्लवीताई सावकारे, रोटरी क्लबचे चेअरमन संजू भटकर व गटशिक्षणाधिकारी विजय पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील यांनी केले.

यावेळी प्रमुख वक्ते महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी सांगितले की, शब्दांमध्ये राष्ट्राला एकसंघ करण्याची ताकत आहे. ती ताकत लेखणीच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम जागर प्रतिष्ठान करीत आहे. विखुरलेल्या आणि विभागलेल्या जाती पंथाला मानवाची मधुर वाणी एकत्रित करू शकते. तसेच मानवाच्या अंगी असलेल्या संस्कारांचे उदाहरण देताना महाराज म्हणाले की, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणायचे कारण त्यांनी बुद्धीचा आणि क्षमतांचा विधायक उपयोग केला. तेच मिसाईल एखादे राष्ट्र किंवा जग उध्वस्त करण्यासाठी देखील कारणीभूत करू शकते. आणि म्हणूनच मानवाच्या अंगी असलेले संस्कार हे एक सक्षम समाज निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन गुरुदेव यांनी केले.

शिक्षक ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती – उद्योजक श्रीराम पाटील
समारंभाध्यक्ष श्रीराम पाटील यांनी सांगितले की, शिक्षक ही राष्ट्राची अमूल्य संपत्ती आहे. शिक्षकांमुळे जनमानसात चांगले विचार रुजविले जातात. बालपणापासूनच गुरु हा शिष्याचे आयुष्य घडवीत असतो.उत्तम संस्कार विघातक अवगुनांना मोगरी लावण्याचे काम करीत असतात. शाळा महाविद्यालयातून बाहेर पडणारी ही संस्कृती राष्ट्र निर्मितीत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात.

जागर निबंध स्पर्धा ही उद्याचे अधिकारी घडविण्यासाठी – गोपाल दर्जी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक गोपाल दर्जी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, जागर प्रतिष्ठानने आयोजित केलेली निबंध स्पर्धा ही उद्याचे अधिकारी घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाहिली आहे. एमपीएससी यूपीएससी परीक्षांमध्ये तब्बल अडीचशे गुणांचा निबंध असतो. त्यातून तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रसंगावधानतेची ओळख केली जात असते. शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतरांसाठी निबंध आयोजित करणे निश्चितच प्रशंसनीय कार्य जागर प्रतिष्ठानने केल्याचे गोपाल दर्जी यांनी सांगितले. प्रसंगी संजू भटकर यांनी देखील विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले. तर आभार समाधान जाधव यांनी आभार मांडले. यशस्वीतेसाठी प्रकल्पप्रमुख जीवन महाजन, समन्वयक सुनील वानखेडे, सहसमन्वयक समाधान जाधव मार्गदर्शन समिती सदस्य संजू भटकर, विजय पवार, प्रदीप सोनवणे, निलेश पाटील, डी. एम. घुले, उमाकांत पाटील, मनोज लुल्ले, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा पंकज पाटील, कोषाध्यक्ष हृषिकेश पावर, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, सचिव निलेश गुरुचल, पवन पाटील, गोकुळ सोनवणे, मुकेश बोरोले यांनी प्रयत्न केले.

स्पर्धेचा निकाल
जागर निबंध स्पर्धेत खालील यशस्वी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. गट क्र. १ स्पर्धेत शिक्षक गटातून प्रथम रामचंद्र शंकर काळे (बोदवड ), द्वितीय वर्षा आबासाहेब अहिरराव ( जळगाव ) तृतीय प्रशांत अर्जुन चौधरी ( बोदवड ), उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी मनोज नत्थु लुले ( मुक्ताई नगर ), गोपीचंद शामराव सपकाळे ( चोपडा ), सुनीता निलेश पाटील ( रावेर ) व मनीषा अरुण पाटे ( भडगाव ) ठरले.
गट क्र. २ शिक्षकेतर गटातून प्रथम मोहनदास भास्कर महाजन ( रावेर ) द्वितीय विजासिंग रामसिंग पाटील ( भुसावळ ) पारितोषिकाचे मानकरी ठरले. गट क्र. 3 खुल्या गटात प्रथम शुभम श्रीराम खैरनार ( पाचोरा ), द्वितीय साक्षी गोविंद वाणी (भुसावळ ), तृतीय अभिजित ज्ञानेश्वर अहिरे ( चाळीसगाव ) तर उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी सुजाता लखीचंड राय ( चाळीसगाव ), वैष्णवी गजानन पाटील ( रावेर ) व हेमंत एस पाटील ( पाचोरा ) ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here