सचिन सावंत यांचा प्रवक्ते पदाचा राजीनामा; हायकमांडला पत्र लिहून कळवली नाराजी

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : पत्रकार परिषदा, सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरील पॅनल चर्चेच्या माध्यमांतून गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडणारे व विरोधकांचे हल्ले परतावून लावणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी अतुल लोंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतं.

काँग्रेसच्या कामात सुसूत्रता यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची फेररचना केली आहे. हे करताना अनेक पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. माध्यम आणि संवाद विभाग समितीमध्ये सचिन सावंत यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी अतुल लोंढे यांच्याकडं देण्यात आली आहे. त्यामुळं सावंत यांना लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे. नव्या बदलामुळं सावंत नाराज झाले आहेत. परिणामी त्यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं, असं पत्र त्यांनी काँग्रेस हायकमांडला लिहिलं आहे. सावंत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रवक्ते पदाचा टॅगही काढला आहे.

सचिन सावंत हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र काँग्रेसचा मीडियातील चेहरा बनले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ते सातत्यानं काँग्रेसची व महाविकास आघाडीची बाजू ठामपणे मांडत होते. काँग्रेसवरील टीकेचा प्रतिवाद करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासही ते कचरत नव्हते. विधान परिषदेच्या आमदारकीसाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सावंत यांचे महत्त्व हळूहळू कमी झाले होते. अशातच त्यांच्याकडील मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळं त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून समजतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here