लॉकडाऊननंतरचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार पहिला मराठी सिनेमा ‘जयंती’

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांमध्ये सगळ्यांना पावणे दोन वर्ष काढावी लागली आहेत. आता निर्बंध उठवण्यात आल्यानंतर थिएटर्सदेखील सुरू होत आहेत. गेल्या दीड वर्षात सिनेसृष्टी ठप्प झाली होती. मराठी सिनेमा आणि नाट्यव्यवसाय देखील ठप्प झाला होता. पण आता लॉकडाऊननंतरचा पहिला मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

शैलेश नरवाडे दिग्दर्शित आणि मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओची निर्मिती असलेला ‘जयंती’ हा लॉकडाऊननंतरचा पहिला मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. १२ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नावातील वेगळेपणामुळेच हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आला आहे. आर्टिकल १५, मुल्क, थप्पड यासारख्या सिनेमांना संगीत देणारे दिग्गज संगीतकार मंगेश धाकडे यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे, तर प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी या सिनेमात गाणी गायली आहेत. गीतकार गुरू ठाकूर यांनी या सिनेमातील गाणी लिहिली आहेत.

दिग्गज कलाकारांसह नवोदित कलाकारांच्या अदाकारीचा अनोखा मिलाफ या सिनेमामध्ये प्रेक्षकांना अनुभवता मिळणार आहे. ऋतुराज वानखेडे, तितिक्षा तावडे या कलाकारांचे या सिनेमातून पदार्पण होत आहे. तर मिलिंद शिंदे, वीरा साथीदार, किशोर कदम, पंढरीनाथ कांबळे, अंजली जोगळेकर आणि अमर उपाध्याय या कलाकारांनी या सिनेमामध्ये भूमिका साकारल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here