अनिल देशमुख, परमबीर सिंग यांच्या गायब असणाऱ्यावर अमृता फडणवीस यांचा महाविकास आघाडीला सवाल
मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : ‘राज्याचे माजी गृहमंत्री असोत नाहीतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असोत. त्यांचे कुठे हनीमून सुरू आहे हे शोधून काढायला हवे. तुम्हा माध्यमांना कळलं तर तुम्ही यंत्रणांना त्याबाबत रिपोर्ट करा, म्हणजे त्यांना लवकरात लवकर पकडता येईल’, अशी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लक्ष्य केले.
देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईतील सी. पी. टँक रोडवरील माधव बाग मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. अनिल देशमुख आणि परमबीर सिंग हे तपासात सहकार्य करत नाहीत. यंत्रणांपुढे हजर होत नाहीत, त्याबाबत काय सांगाल, असे विचारले असता, त्यांना मस्ती आली आहे. त्यांचं कुठे हनीमून चाललं आहे आपल्याला माहीत नाही पण त्यांना शोधून काढलं पाहिजे, असं फडणवीस म्हणाल्या.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप आघाडीचे नेते करत आहेत. त्याबाबत विचारले असता, तुम्ही तशी कामं करताय म्हणून तुमच्यावर आरोप होत आहेत. तुम्ही भजनं म्हणताय म्हणून तर आरोप केले नाहीत ना? तुम्ही जलयुक्त शिवारसारख्या योजनेवर जर आरोप करू शकता तर आम्ही जे समोर दिसतंय त्यावर आरोप करायचा नाही का? आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं बोलत आहोत आणि काहीही चुकीचं घडलं तर आम्ही गप्प बसणार नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. शिवसेनेचे मुखपत्र सामनावरही त्यांनी टीका केली. ते भाजपवरच टीका करणार. जर त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली तर त्यांचे वसुली सरकार कसे चालणार?, असा खोचक सवाल त्यांनी केला.






