दिल्ली : राजधानीच्या बिंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत मंगळवारी रात्री चाकूहल्ला करून एका २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आलीय. तरुणीचा पाठलाग करत आरोपीनं तिच्यावर चाकूचे सपासप वार केले.
हल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू झाल्याचं समजून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी, भागातून जाणाऱ्या एका फूड डिलिव्हरी बॉयनं पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तरुणीला रुग्णालयात दाखल केलं. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मृत २२ वर्षीय तरुणी इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. तिच्या शरीरावर १० हून अधिक चाकूहल्ल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तरुणीच्या ओळखीच्या लोकांपैंकीच तिची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येतंय. तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास पोलिसांकडून या घटनेबद्दल माहिती मिळाली. एका वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचं सांगत तरुणी घराबाहेर पडली होती. वाढदिवसाचा केक कापला जाईपर्यंत आपल्याला घरी परतायला उशीर होणार असल्याचंही तिनं घरी कळवलं होतं.
मात्र, कुटुंबीयांना एका ओळखीतील व्यक्तीनं फोन केला. अंकित नावाच्या एका मुलानं आपल्यावर बंदूक ताणली असल्याचं आणि त्याच्याकडून आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचं तरुणीनं या व्यक्तीला फोनवर सांगितलं होतं. या व्यक्तीचा फोन बंद होऊन इतर काही माहिती मिळण्याच्या आधीच पोलीस कुटुंबीयांपर्यंत पोहचले होते. तरुणी जखमी अवस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांनी कुटुंबीयांना दिली. मात्र, मुलीला रुग्णालयात पोहचवण्यात पोलिसांनी उशीर केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.






