अलिबाग-सोगावकर : रायगड जिल्ह्यात मुख्यतः अलिबाग, मुरुड कडे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित असे कुलाबा किल्ला,मुरुड येथील जंजिरा किल्ला तसेच इतर ऐतिहासिक वास्तू यांच्या इतिहासाची विस्तृत अशी ठोस माहिती पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना मिळत नव्हती, याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत “आरसेटी” रायगड मार्फत १० दिवसीय “टुरिस्ट गाईड” प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम (दि.१८ ऑक्टोबर) रोजी संपन्न झाला.
दि. ९ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण २२ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणादरम्यान सहभागी प्रशिक्षणार्थींना पर्यटन क्षेत्रातील विविध संधी, टुरिस्ट गाईड च्या जबाबदाऱ्या, पर्यटनाचे विविध प्रकार, इतिहास, अलिबाग-मुरुड मधील किल्ल्यांचा इतिहास, निसर्ग, पक्षी निरीक्षण, साहसी टूर, टूर पॅकेज चे नियोजन,अशा विविध विषयांबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये “टुरिस्ट गाईड” प्रशिक्षणासोबत उद्योजकीय सक्षमता, संवाद कौशल्य, मार्केटिंग, ध्येय निश्चिती व जोखीम विश्लेषण, आत्मविश्वास बांधणी, बँकिंग, कर्ज अशा विषयांबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
“आरसेटी” रायगड द्वारे आयोजित या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकासह काही ऐतिहासिक स्थळांना २ दिवसांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे विविध विषय शिकविण्यात आले. यामध्ये विशेषतः हिराकोट तळे येथील हेरिटेज वॉक दरम्यान जेष्ठ पत्रकार श्री.जयंत धुळप यांनी हिराकोट तळ्याच्या इतिहासाबाबत सविस्तर माहिती दिली तर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नववी पिढीचे वंशज श्री.रघुजी राजे आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्याचे वैभव, इतिहास तसेच किल्ल्याच्या संरचनेबद्दल प्रशिक्षणार्थीना सविस्तर माहिती दिली.
अलिबाग शहराजवळ पंतनगर येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, हा प्रशिक्षण वर्ग यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी श्री.संजय नाईक आणि सौ.श्वेता नाईक यांच्यासह संस्थेचे राज्याचे संचालक श्री. सुनील कस्तुरे, श्री.सुधीर सेवेकर, श्री.उमेश पटवर्धन, श्री.निमिष परब, सौ.संगिता कळसकर, श्री.सोहम दादरकर, उद्योजक श्री.संदीप घरत, रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप आणि संस्थेचे संचालक श्री.आनंद राठोड, प्राची देशमुख या सर्व मान्यवरांनी अत्यंत महत्वाचे आणि मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गासाठी समन्वयक म्हणून मीना श्रीमाळी, प्रसाद पाटील आणि निखिल घरत यांनी चोख जबाबदारी पार पाडली.







