ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : व्यावसायिकाच्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या एका महिला रिक्षाचालकाला कळवा पोलिसांनी टिटवाळा येथून अटक करत तिच्या ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका केली. भीक मागण्यासाठी तसेच गैरकृत्य करण्याकरिता या महिलेने मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीनंतर समोर आली आहे. अपहरणानंतर तिने मुलाला तिच्या घरामध्येच डांबून ठेवले होते. पोलिसांनी केवळ १२ तासांमध्ये या गुन्ह्याची उकल केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, राखी बनवण्याचा व्यवसाय करणारे ३८ वर्षीय व्यावसायिक कळव्यातील खारेगाव परिसरात राहतात. त्यांचा तीन वर्षाचा मुलगा बुधवारी सायंकाळी राहत्या इमारतीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी त्याचे अपहरण करण्यात आले. रात्री ८ वाजता कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलाचा शोध सुरू केला. ज्या ठिकाणावरून मुलाचे अपहरण झाले तेथून खारेगाव एंट्री पॉइंट पर्यंत असलेल्या विविध सोसायट्या, इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी पाहणी केली. त्यावेळी एक महिला या मुलाला रिक्षातून पळवून घेऊन जात असल्याचे समोर आले.
त्यानंतर त्वरित पोलीस उप निरीक्षक एम. बी. कवळे यांच्या पथकाने रिक्षा नंबर आणि अन्य माहिती प्राप्त करत टिटवाळ्यातील बनेली गावात राहणारी रिक्षाचालक नूरजहाँ साबीर शेख (वय २५ वर्ष) हिला तिच्या घरातून अटक केले. तसेच तिच्या ताब्यातून अपहृत मुलाचा सुखरूप सुटका केली. केवळ १२ तासांच्या आत पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन अपहरणकर्त्या महिलेला जेरबंद केले. पोलिसांनी रिक्षाही जप्त केली आहे. नूरजहाँकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये तिने बालकाचे अपहरण गैरकृत्य करण्यासाठी तसेच भीक मागण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले. शिवाय तिने या बालकाला घरीच डांबून ठेवले होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी या गुन्ह्याची उकल केली.
रिक्षाचालक नूरजहाँ साबीर शेख ही पूर्वी कळव्यात राहत होती. त्यामुळे तिला कळव्याची माहिती आहे. बुधवारी भाडे घेऊन ती कळव्यात आली होती. त्यावेळी तिने तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची माहिती पोलीस उप निरीक्षक कवळे यांनी दिली. उद्या, शुक्रवारी तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे.






