मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं अजून मोठं गिफ्ट हवं होतं. यामुळे आज बुधवारपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पुणे, सोलापूर, नाशिक, मनमाड, नागपूर या ठिकाणी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संप पुकारू, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाही तर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी सर्व बस बंद देखील राहण्याची शक्यता असून याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल. असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
दरम्यान, पाच टक्के महागाई भत्तात वाढ, अडीच हजार रुपये दिवाळी भेटीची घोषणा एसटी महामंडळाने केल्यानंतरही त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा केले जात आहे. यावेळी जर एसटी सेवा कोलमडल्यास उपोषणात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असं परिपत्रकच एसटी महामंडळाने काढण्यात आले होते, तरी आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.






