धक्कादायक : अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नसल्याची परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रात माहिती

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत राज्यात राजकारणात खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत परमबीर यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली असताना देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर सिंग यांच्याकडे नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्याचवेळी राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्या. कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोगाची सरकारने नेमणूक केली आहे. या आयोगासमोर परमबीर यांनी वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केले आहे. सिंग यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्यावेळी आयोगासमोर सादर केलं असल्याचं या वकिलांनी सांगितले. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिलं आहे, त्याशिवाय दुसरा कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असे हिरे यांनी सांगितले. परमबीर या प्रकरणात उलटतपासणीस देखील तयार नसल्याचे हिरे यांनी स्पष्ट केलं.

परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here