आर्यन प्रकरणातून वानखेडेंना हटवले; लगेचच नवाब मलिक यांचे सूचक ट्वीट

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. एनसीबी महासंचालकांनी हा निर्णय घेतल्यानंतर वानखेडे यांच्याविरुद्ध सातत्याने आरोपांच्या फैरी झाडणारे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक सूचक ट्वीट केले आहे.

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण देशभर गाजत आहे. या हायप्रोफाइल प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यन सध्या जामिनावर सुटला आहे. याच प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने आर्यनच्या सुटकेसाठी खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा तपास एनसीबीकडून तसेच मुंबई पोलिसांकडूनही सुरू आहे. दुसरीकडे कॉर्डेलिया क्रूझवरील छापाच बोगस होता, असा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. यासह आणखीही काही प्रकरणांच्या बाबतीत मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यात मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. मुंबईत सेलिब्रिटींना टार्गेट करून खंडणीवसुलीचं रॅकेट चालवलं जात आहे. या रॅकेटमध्ये वानखेडे आणि एनसीबीचे काही अधिकारी सामील आहेत, असा मलिक यांचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनसीबी महासंचालकांनी मोठा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह एकूण सहा प्रकरणांचा तपास समीर वानखेडे व त्यांच्या टीमकडून काढून घेण्यात आला आहे. त्यात मलिक यांचे जावई समीर खान यांचेही प्रकरण आहे. त्यावरच बोट ठेवत मलिक यांनी एक ट्वीट केले आहे. ‘समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरण व अन्य पाच प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आले आहे. अशा एकूण २६ प्रकरणांचा तपास करणे आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. या व्यवस्थेची साफसफाई करण्यासाठी अजून बरंच काही करायचं आहे आणि आम्ही ते करणार आहोत’, असे सूचक ट्वीट मलिक यांनी केले आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांची मुंबईतून बदली करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, याबाबत अद्याप एनसीबी मुख्यालयातून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here