कोल्हापूर (नियाज जमादार) – बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे. मनगुत्ती येथे हटवण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनानं दिलं आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून 8 दिवसांत पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
येत्या 8 दिवसांत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठक होणार असून पुतळा बसवण्याची तारीख ठरवण्यात येणार आहे. मात्र, बेळगाव प्रशासनानं 8 दिवसांत शिवरायांचा पुतळा बसवला नाही तर 9 व्या दिवशी गावकरी पुतळा बसवतील, अशी मनगुत्ती येथील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने गावातील चौकात जमले आहेत.
बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापलं होतं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे तिव्र पडसाद उमटले होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एवढंच नाही तर शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद चांगलाच पेटला आहे. मनगुत्ती येथील आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मनगुत्ती गावामध्ये रविवारी मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता मराठी भाषिकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे मनगुत्ती गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
पोलिस अधीक्षक निम्बर्गी हे मनगुत्ती गावात दाखल झाले होते. गावात सध्या सशस्त्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या स्थितीत तात्काळ बसवावा, अशी मागणी सीमाभागातल्या मराठी बांधवांनी केली आहे. दुसरीकडे, भाजपचे नेते नितेश राणे यांनी या प्रकरणात उडी घेत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केलं आहे. बेळगावात शिवरायांचा पुतळा काँगेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी हटवला आहे, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केली आहे. आता नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस काय स्पष्टीकरण देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Home पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर अखेर कर्नाटक सरकार आलं भानावर, शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवणार







