नाशिक (विशेष प्रतिनिधी) : शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गुरूवारी (दि.११) आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगर भागात राहणाऱ्या समाधान सुभाष माळी (३५ रा.शिवधारा रो हाऊस दत्त मंदिरासमोर) यांनी गुरूवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. मनिष महाजन यांनी दिलेल्या खबरीवरून इदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चकोर करीत आहेत.
दुसरी घटना टाकळीरोड भागात घडली. दिगंबर कचरू थोरात (४० रा.राहूलनगर,गांधीनगर) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच भाऊ उत्तम थोरात यांनी त्यास तात्काळ उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.






