मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रांचने महत्वाचे पाऊल उचलले आहे. परमबीर सिंग यांना फरार करण्यात यावे यासाठी क्राईम ब्रांचने आज कोर्टात अर्ज सादर केला आहे. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर हा अर्ज सादर केला आहे.
क्राईम ब्रांचने परमबीर सिंग यांच्यासोबत रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू यांच्यासाठीही अर्ज दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध या आधी ३ अजामिनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आलेली आहेत, त्यामुळे आरोपीला फरार म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यासाठी आम्ही आज कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती सरकारी वकील शेखर जगताप यांनी दिली. कोर्ट या अर्जावर सोमवारी निकाल देणार आहे.
३० ऑक्टोबरला याच कोर्टाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तिसरे अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. अजामिनपात्र वॉरंट जारी केल्यानंतरही आरोपी समोर आलेला नसल्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात यावे, अशी मागणी क्राईम ब्रांचने कोर्टासमोर केली आहे. परमबीर सिंग आणि इतर आरोपींविरुद्ध IPC च्या ३८४, ३८५, ३८८, १२० ब आणि ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यावेळी तिन्ही आरोपींविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आले त्यावेळी आरोपींच्या शोधासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. अधिकाऱ्याने तिन्ही आरोपींना त्यांच्या अखेरच्या पत्त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला असता ते तिकडे सापडले नाहीत.
गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने सचिन वाझे, परमबीर सिंग, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज पटेल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. माझे पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे बोहो रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये बीसीबी स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी ९ लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी – फेब्रुवारी २०२० पासून ते मार्च २०२१ या काळात ९ लाखांची वसूली केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता. अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.






