सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : विलिनीकरणाच्या मागणीवरून जिल्ह्यातील एस.टी. कर्मचार्यांचा संप चिघळला आहे. सलग दुसर्या दिवशी मिरज-कर्नाटक सीमा (एम.एच. १४ बी.टी. १०८७) या एस.टी.वर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी चालक चंद्रकांत पांडुरंग सुतार यांनी अज्ञाताविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी मिरज आगारातून दोन एस.टी. गाड्या कर्नाटक सीमेपर्यंत सोडण्यात आल्या. एका गाडीच्या दोन फेर्या झाल्या होत्या. तोडफोड करण्यात आलेल्या गाडीची चौथी फेरी सुरू होती.
ही गाडी म्हैसाळ ते कर्नाटक सीमेजवळ गेली असता सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी एस.टी.वर समोरून दगडफेक केली. त्यावेळी काच फुटली. त्यानंतर एस.टी. कर्नाटक सीमेपर्यंत रवाना करण्यात आली. त्या ठिकाणी प्रवाशांना उतरवून रात्री उशिरा ती गाडी मिरजेत दाखल झाली. दगडफेकीत एस.टी.चे सुमारे ६ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे चालक सुतार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.






