मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात मुंबई काँग्रेसने आज तीव्र आंदोलन केले व अंधेरी पूर्व येथील पोलीस ठाण्यात तक्रार देत कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
‘भारताला १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. त्यावरून देशभरात पडसाद उमटत असून मुंबईत आज काँग्रेसने तीव्र निदर्शने केली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कंगना राणावत तसेच केंद्रातील मोदी सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. निदर्शनांनंतर अंधेरी पूर्व येथील पोलीस ठाण्यात जाऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कंगनाविरुद्ध तक्रार दिली. कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना भाई जगताप म्हणाले की, आज आम्ही देशातील नागरिकांच्या भावना मांडण्यासाठी येथे आलो आहोत. कंगना राणावतसारखी चित्रपटात काम करणारी एक छोटी नटी देशाला १९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती म्हणत आहे. थोर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्या सर्वांचा हा अपमान आहे. एवढंच नव्हे तर कंगनाच्या वक्तव्याने देशातील १३२ कोटी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि म्हणूनच तिच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत.
अंधेरी पोलीस ठाण्यात येऊन आम्ही कंगनाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. देशद्रोहाचा गुन्हा हा पोलीस ठाण्यात दाखल होत नाही. त्यामुळे पोलीस आमच्या तक्रारीच्या आधारे चौकशी करून न्यायिक प्रक्रियेनुसार कंगनावर गुन्हा दाखल करून घेतील अशी अपेक्षा असल्याचे जगताप यांनी पुढे नमूद केले. कंगनाला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला असून देशाचा अपमान करणाऱ्या कंगनाकडून हा पुरस्कार काढून घेतला गेला पाहिजे, अशी मागणीही जगताप यांनी केली. यावेळी माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार अशोक जाधव, जिल्हाध्यक्ष क्लाइव्ह डायस, सूरजसिंह ठाकूर उपस्थित होते.







