मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : गिरगाव येथील महिलेला केबीसीची ५५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून या महिलेला फसविण्यात आले. लॉटरीचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचे कळताच महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गिरगावच्या पुंभारवाडा परिसरात राहणाऱया गृहिणी पतीला वेफर्स विक्रीच्या व्यवसायात हातभार लावतात. घरसंसार चालवताना काटकसर करीत या दोघांनी चार लाखांची रक्कम जमा केली होती. त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू असतानाच महिलेच्या मोबाईलवर नीता नाव सांगणाऱ्या महिलेचा फोन आला. केबीसीमधून बोलत असल्याचे सांगून तिने या गृहिणीचे अभिनंदन केले. केबीसीची ५५ लाखांची लॉटरी तुम्हाला लागली आहे. आपण इच्छुक असाल तर संपर्क करा असे नीता हिने सांगितले.
संपर्कासाठी तिने एक मोबाईल क्रमांक दिला. गृहिणीने कोणतीही खातरजमा न करता आनंदाच्या भरात नीताने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. समोरील व्यक्तीने लॉटरीचे पैसे मिळविण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सांगून कर, वेगवेगळे चार्जेस भरावे लागतील असे सांगत शिताफीने चार लाख रुपये या गृहिणीकडून उकळले. दरम्यान, कष्ट करून जमावलेली रक्कम संपत असल्याचे पाहून यापेक्षा अधिक रक्कम देण्यास तिने नकार दिला. यानंतर केबीसी कार्यालयातून बोलणाऱ्यांनी संपर्क तोडला.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे या महिलेच्या लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली आहे.






