चेंबूरमध्ये सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने संपविले आयुष्य

मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याने आयुष्य संपविल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी सुनेसह तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.

चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात राहणारे पवन देवदत्त वाघमारे (वय २९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नीसोबत वारंवार होणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे आईवडिलांनी त्यांना दुसरीकडे राहण्यास सांगितले. पत्नी पूजाला तेथेच राहायचे असल्याने तिने ३ महिन्यांपूर्वी सासूसासऱ्याविरोधात विनयभंग व मारहाणीची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत सासरे देवदत्त वाघमारे (वय ४९) यांना अटक केली. तेव्हापासून देवदत्त हे मानसिक तणावाखाली होते.

पत्नीला वेळोवेळी सांगूनदेखील ती सासूसासऱ्यासोबत भांडण करत होती. सासूसासरे मेल्याशिवाय घर नावावर होणार नाही म्हणत, पत्नीसह तिचे कुटुंब दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी १५ लाखांची मागणी करू लागले. या प्रकारामुळे वडील आणखीन तणावाखाली गेल्याचे पवन यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

त्यानंतर ३० नोव्हेबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास वडील रिक्षा चालविण्यासाठी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर आईदेखील कामानिमित्त बाहेर पडली. दुपारी १२ च्या सुमारास जेवणासाठी घरी गेल्यानंतर देवदत्त हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शेजारांच्या मदतीने त्यांना खाली काढून राजावाडी रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची वर्दी लागताच चुनाभट्टी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांना देवदत्त यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली.

सुनेसह तिच्या कुटुंबीयाकड़ून १५ लाखांसाठी खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याबरोबर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितले. यालाच कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार, पोलिसांनी बुधवारी सुनेसह तिचे आईवडील आणि बहीणभावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here