नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) : महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी कांदा चाळ उभारणीसाठी राज्य शासनाने ६२.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत एकूण २५० कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६२.५० कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणी प्रकल्प सन २०२१ – २२ व २०२२ – २३ मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर प्रकल्पांतर्गत एकूण २५० कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरूपात रू. १२५ कोटी निधी दोन वर्षांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीने सन २०२१-२२ व २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी १२५ कोटी नियतवाटप मंजूर केलेले आहे. आता सदर प्रकल्प सन २०२२ – २३ मध्ये राबविण्यासाठी शिल्लक ६२.५० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
दरम्यान, हा प्रकल्प ५०:५० या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी रू ६२.५० कोटी निधी राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.







