मुंबईत अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ – आदित्य ठाकरे

चोपडा (तालुका ग्रामीण प्रतिनिधी संदिप पाटील) – बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

यासंदर्भात आमदार सुनील प्रभु यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री श्री. ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत आज १२ ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. मुंबईकरांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here