राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांचे निधन
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – करोनाच्या संसर्गामुळे पंढरपूर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तीघांचा मृत्यू झाला आहे.या भयंकर घटनेमुळे पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात जनतेतून हळहळ व्यक्त केली जात आहे,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजू बापू पाटील यांचे सोलापूर येथे खासगी रुग्णालयात करोनाचा उपचारा दरम्यान आज पहाटे प्राणज्योत मालवली आहे. पाटील यांच्या कुटुंबातील त्यांचे चुलते, धाकटे बंधु आणि आता राजू बापू पाटील यांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पंढरपूर तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तालुक्यातील भासे येथे करोना रूग्णांची संख्या वाढत गेली. या मध्ये राजू बापू पाटील यांचे चुलते यांचे करोना मुळे काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्या नंतर त्यांचे धाकटे बंधू महेश पाटील यांचाही करोनामूळे मृत्यू झाला आहे.
तर आज पुन्हा पाटील कुटुंबावर दुर्दैवाने डोंगर कोसळला आहे, त्यांच्या घरातील कर्ते असलेले राजु बापू पाटील यांचे ही निधन झाले आहे, त्यामुळे पाटील कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे, यामुळे संपूर्ण पंढरपूर आणि माळशिरस व मोहोळ तालुक्यातील जनतेतून दुःख व्यक्त केले जात आहे.
राजू बापू पाटील यांना देखील करोनाची लागण झाली होती. पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथे हलविण्यात आले. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.राजु बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात नजीकचे आणि विश्वासू सहकारी समजले जातात. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी आपले वलय निर्माण केले होते. नुकताच त्यांनी गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.
शरद पवार यांच्या शिफारशीवरून, आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती, यापूर्वी त्यांचे वडील कै. यशवंत भाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षापर्यंत या रयत शिक्षण संस्थेचे सदस्य पद भूषवले होते.त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , भाऊ , भावजय आहेत. लोकांना सहज भेटणारे आणि या पंचक्रोशीतील जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.







