मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर दोन आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने २८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे या प्रकरणात जामीन मिळून सुद्धा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. सध्या या प्रकरणात अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
शंभर कोटी कथित वसुली प्रकरण तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला होता.






