जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील विविध भागात सुरु असलेले रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे होत असून, या रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून ऑडीट करुन त्याची चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रस्त्यांची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, संभाजीनगर, रामानंद नगर, गणेश कॉलनी, शिवराम नगर, गणेश कॉलनी ते कोर्ट, बळीराम पेठ या सर्व रस्त्यांचे काम नित्कृष्ठ दर्जाचे झालेले आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये वापरण्यात आलेले डांबर आणि खडी नित्कृष्ठ दर्जाचे असून, रस्त्यांची लेव्हल व पातळी न पाहता कामे झालेली आहे. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी उतार आणि इतर तांत्रिक बाबींच्या विचार करण्यात येत नाही. या कामावर देखरेख करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम व महानगरपालिकेचा कोणताही अभियंता व कर्मचारी काम सुरु असल्याच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने, मक्तेदारांची मनमानी वाढली आहे. या सर्व कामांची त्रयस्थ संस्था म्हणजेच थर्ड पार्टी वा क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडून साहित्याची तपासणी करून मक्तेदारांना कडक शासन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगर अध्यक्ष रिंकू उमाकांत चौधरी, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल इब्राहिम तडवी, जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक न्याय अशोक सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या असून, या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांना देण्यात आल्या आहेत.







