स्नेहसावली केंद्रात अॅड. ज्योती तांबट यांनी केले कायदेविषयक मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) । आपल्या देशाची ज्येष्ठांचा देश होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ज्येष्ठांच्या समस्या, त्यांच्यावरील अत्याचार समोर येऊ लागल्याने २००७ मध्ये याविषयी कायदा करण्यात आला. २०२१ मध्ये त्यात सुधारणाही केली गेली. यामुळे ज्येष्ठांना आधार मिळाला आहे. मात्र, अजूनही त्या ज्येष्ठाभिमुख झालेल्या नाहीत. ज्येष्ठांचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक छळ केल्यास ३ महिन्यांपर्यंत कारावास होऊ शकतो, असे अॅड. संगीता तांबट यांनी सांगितले.
स्नेहसावली केंद्र, रोटरी क्लब ऑफ ईस्टच्या वतीने ‘वृद्धांचे शोषण : समस्या आणि उपाय’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते. या वेळी स्नेहसावलीचे डॉ. बालाजी आसेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. तांबट म्हणाल्या, मागील दशकात पहिल्यांदाच देशात याविषयीचा कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यामुळे २००७ मध्ये कायदा झाला. यामध्ये मुलगा-मुलगी, नात आणि नातू यांना ज्येष्ठांच्या छळासाठी जबाबदार धरले जात होते. २०२१ मध्ये कायद्यात बदल करून जावई आणि सून यांचाही समावेश त्यात केला आहे.
उतारवयात ज्येष्ठांपुढे अनेक समस्या नैसर्गिकरीत्या उभ्या राहतात. आर्थिक, शारीरिक अडचणींचा ते प्रत्यक्ष सामना करतात. अप्रत्यक्षरीत्या ते मानसिक आजारांचाही सामना करतात. संविधानाच्या कलम २१ नुसार राइट टू लाइफ याअंतर्गत त्यांना जगण्यात अडचणी निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा वेळी त्यांना मदत गरजेची आहे. अडचण असल्यास संपर्क साधावा शहरातील वकिलांचा गट ज्येष्ठांसाठी मोफत सेवा पुरवतो. ज्येष्ठांना अडचण असल्यास कृपया संपर्क साधावा, असे आवाहन अॅड. तांबट यांनी केले.







