बुलढाणा (प्रतिनिधी) : जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.
साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे नेण्यात येणार आहे. तर लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर गुरुवारी एसटी बस आणि शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये चालकासह १७ मुलं जखमी झाले आहे. जखमींना उपचारांसाठी जालन्यात हलवण्यात आलं आहे.







