धुळे (संपादक सुनिल पाटील) : महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. आम्ही जनतेला ईश्वरांचं रुप मानतो. जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जनतेला लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष्य केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “ ”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचं काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे.
काँग्रेस जातीजातीत भेद निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वंचितांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू त्याला विरोध करत होते. अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण दिलं. त्यानंतर इंदिरा गांधींनीही एससी, एसटींना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी प्रयत्न केले. एससी, एसटी, ओबीसी हा समाज मजबूत झाला तर काँग्रेसच्या राजकारणाचं दुकान बंद होईल ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते त्यांच्या आरक्षणाला विरोध करतात”, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.
पुढे बोलताना, “गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने विकासकामांचा नवा उच्चांक गाठला आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गौरव पुन्हा मिळाला आहे. भाजपा महायुती आहे, तर गती आहे आणि तरच महाराष्ट्राची प्रगती आहे, आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्चा दिला. गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आम्ही पूर्ण केली. दुसरीकडे काँग्रेसने राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं. हाच त्यांचा खरा चेहरा आहे”, असेही ते म्हणाले.







